Skip to main content

हे वय? हेच वय!

*हे वय ? हेच वय!*

एवढ्यातच आम्ही दोघेही कोव्हीड मधून सुखरूपपणे बरे होवून वापस आलो आहोत त्यामुळे बऱ्याच ठिकाण कोव्हीडचे अनुभव सांगण्यासाठीच्या वेबीनारमधे बोलवतात. परवाच अशा एका शोमधे आमची ओळख करून दिली. आता ओळख करून देतांना छानच बोलतात,इतकं की कधीकधी फारच जास्ती तारीफ होते, आपल्याला आपल्यातील कलागुण आणि स्वभावा बद्दल बरीच नवीन माहिती होते....... म्हणजे तारीफ ऐकायला बरं वाटत हो, उगाच खोटं कशाला बोलू, पण जेंव्हा ते म्हणाले की हे डॉ. केळकर दांपत्य "ह्या" वयातही  हामोनिका वाजवायला शिकले आणि छान वाजवितात वगैरे,तेंव्हा मात्र मी बुचकळ्यात पडलो की "ह्या वयात" म्हणजे काय ? कोणती ही गोष्ट शिकायला काय वयाची अट असते का ? आणि असलीच तर तसं कुठे लिहीलंय?
अजून पुढे जाऊन त्यांनी सांगितल की या वयातही ते टेबल टेनिस खेळतात आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेतात. आणि त्यांचे सध्याचे जागतिक रँकिंग 23 वे आहे. अहो, ते रँकींग ५० ते ५९ वयोगटातील आहे. आणि मी लहान असतो तर या स्पर्धेत भाग घेऊच शकलो नसतो, असो.

तर मित्रांनो,"ह्या वयाला"या शब्दाला माझा तीव्र आक्षेप आहे. अहो,हे वय म्हणजे काय? हेच तर वय आहे या सर्व गोष्टी करायचे!😄 माझ्या मते खरं आयुष्य हे साठीनंतरच सुरू होतं,कसं ते सांगतो आता.....

*"बालपण देगा देवा,मुंगीसाखरेचा रवा"* या उक्तीवर माझा अजिबात विश्वास नाही,आयुष्याचा सगळ्यात फालतू काळ म्हणजे बालपण,या ठाम विचारांचा मी आहे! बघा,पहिली २-३ वर्षे काहीच कळत नसतं,नंतर बालवाडी,ते ज्युनियर-सिनियर केजी वगैरे ससेमिरा सुरू होतो.बाराखडी,अक्षरं वगैरे ठीक आहे हो,पण ते पाढे हवेत कशाला पाठ करायला या कॅलक्युलेटरच्या जमान्यात? आमच्या वेळी तर दिडकी,अडीचकी,पाऊणकी असे बरेच छळवादी प्रकार असायचे. भरीला भर म्हणून ट्युशन्स,होमवर्क,काही विचारू नका! आता एक किंवा फार फार तर दोन पोरं प्रत्येक जोडप्याला,त्यामुळे प्रत्येकच आईबापाला वाटतं की माझं पोर हुशार व्हावं,आय ए एस,आय पी एस ऑफिसर बनावं, त्यांनी गाणंही मस्त म्हणावं,डान्स ही करावा,चित्रही छान काढावी,स्टेजवर भाषणही कडक द्यावं.आमच्या वेळी हा प्रकार नव्हता जास्त,पण आता इलाज नाही कारण या स्पर्धेच्या युगात टाकायचं असेल तर हे आवश्यकच आहे.

त्यानंतरची अवस्था म्हणजे पौगंडावस्था.हा काळ जास्त कठीण...सर्वांच्याच अपेक्षा खूप,करियर कोणते निवडावे कळत नाही,स्पर्धा जीवघेणी. तारुण्यसुलभ भावना,व्यसनं यांच्यापासून स्वतःला वाचवून परीक्षा पास होणं,कुठेतरी छानशी नोकरी मिळवणं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणं.मग लग्न,मुलंबाळं,स्वतःच ऑफिस,घर या सर्व धकाधकीत पन्नाशी कधी येते ते कळतंच नाही. तोपर्यंत मुलंबाळं मोठी होऊन त्यांची शिक्षणं,नोकऱ्या,लग्न इत्यादी जबाबदाऱ्या वाढतात.इकडे आई-वडीलही वयस्कर होत असतात.त्यांच्या तब्येती सांभाळणं,त्यांची मानसिकता जपून,त्यांचे मार्गदर्शन घेऊन कौटुंबिक सौख्य टिकवून ठेवण्याची कसरतही करावी लागते.

साधारणतः साठीला पोहोचेपर्यंत बऱ्याचश्या गोष्टी मार्गी लागल्या असतात.मुलंबाळं सेटल झाली असतात किंवा होत असतात,आपणही रिटायर होऊन हाती पैसा आला असतो किंवा बिझिनेस असला तर तो पार्टनर किंवा मुलांशी शेयर केला असतो,ज्यांनी आपला ताण हलका होतो,आणि मग आपल्या छान  आयुष्याला खरी सुरुवात होते!

असं मी का म्हणतो ते सांगतो आता :

१. या वयातील बहुतांश लोकांना अजूनतरी काही व्याधी नसतात,असल्या तरी त्या नीट कंट्रोल मध्ये ठेवण्याची कला जमली असते,जसे डायबिटीस,ब्लड प्रेशर वगैरे.

२. त्यांना आता व्यायाम,योगासने इत्यादीसाठी भरपूर वेळ असतो.

३.इतकी वर्षे दाबून ठेवलेल्या स्वतःच्या आवडीनिवडी,छंद यासाठी  वेळ आता देऊ शकतात जसं वाचन,लिखाण,खेळ,संगीत,वाद्ये,भटकंती,मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप चे गेट टुगेदर्स वगैरे.

४.आतापर्यंतच्या आयुष्यात खूप तऱ्हेतऱ्हेचे अनुभव आले असल्यामुळे आयुष्य प्रगल्भ झालेले असते,त्याचा फायदा समाजालाही करून देता येतो,तरुण पिढीला मार्गदर्शन करता येते. अगदी एकाने दहा तरुणांना जरी व्यायाम आणि व्यसनमुक्तीचे धडे दिले तरी पुरे!

५.या वयात शहाणपण,ज्याला wisdom म्हणतात,ते आलेलं असतं,ही मंडळी त्यांच्या भावनांवर जास्त छान नियंत्रण ठेवू शकतात. पटकन दुःख किंवा हर्षातिरेक होत नाही.स्थिर मन असते,सहानुभूती म्हणजे empathy असल्यामुळे समाजसेवा छान करू शकतात.

६.ज्या घरात नातवंडांना आजी-आजोबा आहेत,ते घर खऱ्या अर्थानं भाग्यवान,कारण एका संशोधनात असं सत्य समोर आलंय की आई-वडील आणि आजी-आजोबा यांनी मिळून संगोपन केल्यास मुलांचा मानसिक विकास खूप छान होतो.आणि काय आनंद येतो म्हणून सांगू मला माझ्या नातीला खेळवायला,तरी अजून फक्त तीनच आठवड्याची आहे! एकानं गमतीत लिहून ठेवलंय,मुलं नसली तर चालतील,पण नातवंडं जरूर हवीत!😄

७.अजून एक मज्जा : सिनियर सिटीझन झाल्यामुळे बरेच कन्सेशन्स मिळतात,जसे रेल्वे आणि विमानप्रवास,इन्कम टॅक्स मध्ये सूट,बऱ्याच ठिकाणी वेगळी रांग वगैरे.

८.या वयात माणूस थोडा अध्यात्मिक झाला असतो,आत्तापर्यंत छान आयुष्य दिल्याबद्दल ईश्वर,कुटुंब आणि समाजाप्रती कृतज्ञतेची भावना मनात असते.असं म्हणतात की आयुष्य चांगलं होत नाही,तर आयुष्याला तोंड द्यायला तुम्ही जास्त चांगले तयार असता!

९.मृत्यूचं भय संपलेलं असतं किंवा कमी तरी झालं असतं.मित्रांनो,मृत्यू का होतो? कारण तो एक निसर्गनियम आहे : जीवन हे प्रजनन आणि अपत्यांचे संगोपन करण्यासाठी असते,ही क्षमता संपली,की नैसर्गिक मृत्यू येतो.आजकल हे करोनासारखे निरनिराळे आजार निसर्गाला ही संधी देतच नाहीत म्हणा!
मृत्यू हे एक सत्य आहे,तो कुणालाच चुकला नाही हे कळून चुकलेलं असतं.खरं तर मृत्यू आहे म्हणूनच आयुष्याला अर्थ आहे,नाहीका! कल्पना करा बरं,की आपण सर्व अमर आहोत,आयुष्य अगदी अळणी,बेचव होऊन जाईल,जगण्यातली मजाच निघून जाईल.अहो,मृत्यू नक्की आहे पण  त्याची वेळ माहीत नाही म्हणून तर आपल्याला हवं ते सर्व करण्याची घाई आहे,आणि ध्येय गाठण्याची मजा आहे!

१०. अजून एक फायदा मित्रांनो,आपल्या इम्युन सिस्टिमने आत्तापर्यंत हजारो,लाखो जंतूंचा सामना केलाय,लाखो अँटिबॉडीज बनवल्यायत निरनिराळ्या आजारांविरुद्ध आणि या सर्वांची मेमरी बाळगून आहे ती! त्यामुळे जर इतर कोमॉरबीडीटी नसेल तर साथीच्या आजारांचा सामना आपण जास्त चांगला करू शकतो.इसवीसन १९१८ चा फ्लू आणि २००९ चा स्वाइन फ्लू यातील बहुतांश मृत्यू ६५ वर्षांखालील होते,आणि आताच्या करोना साथीत सुद्धा सत्तरीच्या वर फार कमी लोक मरण पावलेयत.

११. अजून एक गम्मत सांगतो तुम्हाला,अंदरकी बात आहे : या वयात कोंपिटीशन फार कमी असते त्यामुळे जे तुम्ही मन लावून कराल त्यात भरपूर नाव होईल,भरघोस यश मिळेल,हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मग ते हार्मोनिका वाजवणं असो की टेबल टेनिस खेळणं! आमच्या तरुणपणी जे टॉप खेळाडू होते ते आता व्हेटरन्स स्पर्धेत भागच घेत नाहीत,कारण जे लोक तरुणपणी जगात पहिल्या पाच-दहा मध्ये राहून चुकलेत त्यांना आता जिंकण्याची ईर्षा राहिली नाही आणि ते कोचिंग करून नवीन तरुण खेळाडू घडवतायत,त्यामुळे माझ्यासारखा माणूस केवळ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून जगात तेविसावे रँकिंग मिळवू शकला आणि पुढच्या वर्षांपासून साठ ते पासष्ठ ग्रुप मध्ये प्रमोशन,अजूनच मजा,असो! मला चीनच्या शेंझेंन येथील स्पर्धेमधल्या टी-शर्ट वरचा *"Better with Age"* हा संदेश खूप आवडलाय.

१२.एक महत्वाची गोष्ट सांगतो,हे माझं मत आहे.मी कधीच "आमच्यावेळी असं होतं,तो काळ काय छान होता,आता ती मजा नाही"असं म्हणत नाही.कारण,बदल हा निसर्गनियम आहे,बदला किंवा विनाश ओढवून घ्या! त्यामुळे कॉम्प्युटर्स,मोबाईल,नेटसर्फिंग,गुगल या सर्वांशी दोस्ती करणे गरजेचं आहे,आणि गम्मत म्हणजे सोप्पं आहे.नव्या पिढीकडून शिकण्यातही काही लाज वाटू देऊ नका.

तर चला मित्रांनो, पॉझिटिव्ह माईंडसेट ठेवूया,छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद घेणे शिकूया,काहीतरी नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करूया,त्याचसोबत अपूर्णतेच्या चवीला गोड मानणेही शिकूया.योग्य आहार घेऊया,नियमित व्यायाम करूया,गरीब-विकलांगांना मदत करूया आणि प्राण्यांवर प्रेम करूया,निसर्गाचा समतोल राखूया,जे आवडेल ते करूया आणि समजूतदारीनं खर्च करूया,मित्रांसोबत आनंदाने राहूया,समाजाचं देणं देऊया आणि,जर कुणी पुन्हा म्हणालं की ह्या वयात? तर त्याला खणखणीत आवाजात उत्तर देऊया की ह्याच वयात!🙏🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

Senseless Sense of Well Being

Hello friends. There are a few side effects of development. The one I am seeing obviously is the spurt of Wellness-Fitness centers,Gymnasiums,Spiritual Gurus holding Satsangs,verious diet planners,Weight loss-inch loss centres,Personality development courses,Career guidance centres & many more.We feel that unless we do such courses,we & our children cannot progress, be successful,wealthy & achieve peace of mind. I wonder how the  previous generation managed to do well without having the advantages of these schools. The Tatas,Birlas,Ambanis, Mahindras must have been real lucky,isn't it! Infact,the advent of internet,it's widespread use, resulting in an outburst of knowledge(many times incomplete & confusing) has changed the psyche of the people & these agencies take advantage of this situation to make money. This has become a status symbol amongst the riches,who can afford,but the poor are also lured & made to spend in an attempt to uplift their ...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...