Skip to main content

भाषा,व्याकरण,शुद्धलेखन,शुद्ध-संभाषण ई.

भाषा,व्याकरण,शुद्धलेखन,शुद्ध-संभाषण ई.

मानवानी आपला संदेश,आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाषा शोधून काढली.आधी बहुतेक नुसत्याच खाणाखुणा करीत असावेत. या भाषा प्रत्येक भौगोलिक विभागाच्या आपापल्या होत्या,आजही आहेत.विचारांचे आदानप्रदान समोरासमोर असतांना बोलीभाषेने होई,परंतु हजर नसलेल्या व्यक्तिपर्यंत ते पोहोचण्यासाठी लिखित भाषेचा उदगम झाला.त्यामध्ये सुसूत्रता आणि सुसंबद्धता आणण्यासाठी आणि ती सर्वमान्य होण्यासाठी पुस्तके लिहिल्या गेलीत.कालांतरानी दळणवळणाची साधने वाढली आणि सर्व भूभागातील माणसे एकमेकांना भेटू लागल्यावर काही सर्वमान्य-सामान्य (common) भाषेची जरूर वाटू लागली.इंग्रजांचे राज्य जगातील बऱ्याच भागात असल्यामुळे इंग्रजी ही जगाची सर्वमान्य भाषा बनली,तरी अजूनही बऱ्याच प्रदेशात फ्रेंच,जर्मन,स्पॅनिश ई. भाषाच प्रामुख्याने बोलल्या जातात.आपली राष्ट्रभाषा हिंदी जरी असली तरी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजीच बोलतो,याउलट रशिया,जपान,चीन ई. देशांचे राज्यकर्ते त्यांच्याच राष्ट्रभाषेत बोलतात,दुभाषी असतो हव्या त्या भाषेत भाषांतर करायला,असो!

सर्व प्रादेशिक भाषा या त्या-त्या राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात शिकविल्या जाऊ लागल्या त्यामुळे त्यावर अभ्यासात्मक पुस्तके लिहिल्या गेलीत,व्याकरण शिकविल्या गेले आणि शुद्धलेखनासाठी व्याकरणाचा अभ्यास फार महत्वाचा ठरला.इंग्रजांचा प्रभाव असल्यामुळे शुद्ध इंग्रजी लिहिण्या-वाचण्यासाठी अगदी सुरुवातीपासून तर्खडकर व्याकरण मुलांना शिकविल्या जाऊ लागले.मला आठवतं ते म्हणजे मराठी व्याकरणासोबत त्या शब्दांचे इंग्रजी बंधू अधिपत्य गाजवू लागले आमच्या लहानग्या मनावर; जसे नाम (noun),सर्वनाम(pronoun),विशेषण(adjective),क्रियापद(verb),ई. यापुढील पायरी म्हणजे कर्ता, कर्म(माझं!),करण, मग प्रथम पुरुष,द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष यांची एक फळी उभी राहिली आणि त्यांना चालवायला शिकविले जायचे,उदा.I-go,you-go,He she it-goes,they-go. हे एकदा झाल्यावर भाषेचे प्रयोग शिकविल्या जायचे,कर्तरी-कर्मणी-भावे प्रयोग ई.(अजूनही शहारे येतात अंगावर!)

बोलीभाषाही लिखित भाषेसारखीच शुद्ध बोलावी अशी रास्त अपेक्षा असते या सर्व बुद्धिवाद्यांची,परंतु व्यवहारात याउलट घडतांना दिसते. बोलीभाषेवर ज्या-त्या प्रदेशाचा पगडा असतो.उदा,मराठी भाषा विदर्भात,मराठवाड्यात,खान्देशात,कोकणात आणि पुण्यात खूप वेगळी बोलल्या जाते.(आणि प्रत्येकालाच आपापल्या प्रादेशिक बोलीचा सार्थ अभिमान असतो!) कुठे चाललास?(पुणे),कोठे जाऊ राहिलास?(विदर्भ),कुठं निघाला राव?(पश्चिम महाराष्ट्र),कुठं जायलाय?(मराठवाडा),कुढी चालला भो?(खान्देश). विदर्भात तर लिंगच बदलून टाकतात...बाई म्हणते मी चाललो आणि माणूस म्हणतो मी जाते!😄

तर मित्रांनो,या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची जरूर आज का वाटली....तर मला स्पष्ट असं वाटतं की लिखाण व्याकरणाच्या दृष्टीनं शुद्ध असावे,परंतु बोलतांना याची तमा बाळगू नये,कारण बोलणं हे संभाषणासाठी असतं, परीक्षा देण्यासाठी नव्हे.इंग्लिश भाषाही भारीच चावट...आता जसं स्पेलिंग आहे तसाच उच्चार असावा की नाही?तर तसं नाही...pneumonia चा p सायलेंट,त्याला पन्यूमोनिया नाही म्हणायचे तर न्यूमोनिया म्हणायचे(मग p लिहायचाच कशाला?) Sachet चा उच्चार सॅचेट नाही करायचा तर म्हणे "सॅशे" असा करायचा....का? Data चा उच्चार डाटा असा न करता डेटा असा करायचा,का बरं बॉ? आणि I goes म्हंटलं तर यांच्या बापाचं काय जातं, मी माझ्या मनाचा राजा आहे,I will go or,I will goes, हां! आणि व्यंजनाच्या आधी(a,e,i,o,u) an लावायची जबरदस्ती बोलतांना का करावी..... लिहितांना लिहीन हो,an elephant,पण म्हणतांना a elephant म्हंटलं तर तुमच्या अंगाला भोकं पडतात का?

बोली भाषा हे संवाद साधण्यासाठीचं प्रभावी माध्यम आहे,आपल्याला येईल त्या,जशी शिकली असेल त्या भाषेत सुसंवाद घडावा ही अपेक्षा. माझ्याकडे नेहेमीच medical representatives येतात,बरेच खूप छान इंग्रजी बोलतात,काहींची मात्र इंग्रजी शब्दांची जमवाजमव करून वाक्य बनवतांना खूप तारांबळ उडते,आणि आपलं हसं करून घेतात.मला आठवतंय,काही वर्षांपूर्वी एक MR आला होता,म्हणाला...डाक्तरसाहेब,माही पयलीच नोकरी हाय अन पहिलाच कॉल हाय,मले इंग्लिश जमत नाय,मराठीत बोललो तर चालन काय? हो म्हणालो...त्याचा आत्मविश्वास जबरदस्त...म्हणाला, यक्कच प्रॉडक्ट हाय,आयबुप्यारा...येकदम ष्ट्यानडर गोळी हाय...बमबाट काम करते....स्वस्तबी हाय...सर्वीकडं भेटन... लिहिसान तर माहिबी नोकरी पक्की व्हयीन! मी खूप लिहिली. आज तो बऱ्याच वरच्या पदावर गेलाय आणि आता छान इंग्रजी बोलतो,पण माझ्याशी अजूनही तशाच रांगड्या मराठीत बोलतो... मला तसाच आवडतो तो!

असाच माझा एक अगदी जवळचा मित्र आहे-बबन,सर्व लहानथोर  त्याला बबनमामा  असंच म्हणतात.(आणि तोही सर्वांना मामाच म्हणतो!)पानांचं दुकान आहे त्याचं, अफलातून व्यक्तिमत्व आहे,वल्लीच!भुसावळच्या अमरदीप टॉकीज चौकात प्रसिद्ध आणि खूप जुनं "पटेल पान सेंटर" म्हणून त्याच्या वडिलांच्या काळापासूनचे दुकान आहे, तिन्ही भावंडं मिळून चालवतात ते.अतिशय सज्जन,सहृदयी,अहोरात्र काम करणारी आणि सदैव सर्वांच्या मदतीला तयार असणारी अशी त्यांची ख्याती आहे.एकदा माझे अमेरिकन भाऊ-वहिनी आले होते आमच्याकडं,आणि जेवण झाल्यावर आम्ही पान खायला या मित्राच्या दुकानात गेलो.
"यस मामा,वेलकम,लूकिंग गेस्ट,गुड इव्हनिंग सर,गुड इव्हनिंग मॅडम,आय मेक ब्युटीफुल पान फॉर यू!वहिनीने विचारले- व्हाट इस धिस पान? मी म्हंटलं,बबनराव,आता तुम्हीच  सांगा  हिला समजावून...
तो लागलीच म्हणाला...नो प्रॉब्लेम, मॅडम,यू नो पान, इट इज पान, धिस पान...त्यांनी हाताचा पंजा फैलावून दाखवला आणि त्यावर पान ठेवलं,म्हणाला...धिस ग्रीन पान... यू पुटिंग चुना-कत्था ऑन इट अँड मिक्सिंग अँड मिक्सिंग....देन पुटिंग शोप-सुपारी-गुलकंद-विलायची ऑन इट अँड फोल्डिंग अँड इटिंग....यू सिंग मॅडम? देन आय पुट सम ठंडाई,अलसो कॉल्ड आसमंतारा,थ्रोट क्लियर अँड यू सिंग लाईक लता मंगेशकर!माऊथ फ्रेश नाऊ अँड स्टमक फ्रेश इन द मॉर्निंग...डायजेशन ऑल फूड....नो गॅस,नो ढेकर...
आफ्टर इटिंग वन टाईम,यू कमिंग मेनी टाईम!
वहिनीला बरोब्बर समजलं सगळं,तिनी आवडीनं खाल्लं आणि दुसरं मागून घेतलं!पुढचे तिन्ही दिवस न चुकता रोज रात्री जेवणानंतर आमची वरात  बबनकडे!
प्रत्येकवेळी अमेरिकेहून फोन आला की वहिनी आपुलकीनं आधी  बबनची  विचारपूस जरूर करतात,आणि म्हणतात अमेरिकेला आमच्याकडे याल तेंव्हा बबनमामांना नक्की घेऊन या!🙏

हे असलं अफलातून कम्युनिकेशन स्कील कुठल्यातरी आयआय एम मध्ये शिकवतात का हो?

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ