Skip to main content

*फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात*

*फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात*

मित्रांनो,खरं सांगू? पोह्यांपेक्षा कोणती लाडकी डीश असेल माझी नाश्त्यासाठी तर ती म्हणजे फोडणीची पोळी आणि नंबर दोनवर फोडणीचा भात!

मला खात्री आहे की आक्ख्या महाराष्ट्रात फोडणीची पोळी आवडत नाही किंवा माहीत नाही अशी एकही व्यक्ती नसेल!
भुसावळला आई आणि नागपूरला आज्जी,दोघी फोडणीची पोळी करण्यात एक्सपर्ट! आणि मित्रांनो,अजून एक खासियत म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या हातची फोडणीची पोळी वेगळीच चव घेऊन जन्मास येते.माझ्या एका मित्राची आई हळद फोडणीत न टाकता नंतर वरून टाकायची,त्याचीही चव छान असायची.फोडणीची पोळी मात्र शिळ्या पोळ्यांचीच करावी लागते. मी तर रात्रीच्या जेवणात कमी पोळ्या खाऊन मुद्दाम त्या दुसऱ्या दिवशी फोडणीच्या पोळीसाठी उरवायचो! अजून एक गम्मत म्हणजे पोळ्या हातानीच कुस्करल्या पाहिजेत बरंका,मिक्सरमधून काढल्या की इतक्या बारीक होतात की डिशचा बल्ल्या वाजलाच म्हणून समजा! मस्तपैकी कांदा-टमाटू-कढीपत्ता-लाल मिरची-हिरवी मिरचीची फोडणी,त्यावर चिरलेली ताजी कोथिंबीर,व्वा! मराठवाड्यात शेंगदाणे टाकतात फोडणीत किंवा भाजून सोबत खातात. आणि मला ही चमच्यानी न खाता हातानीच खायला आवडते,हो! याला वेगवेगळी नावं आहेत,कुणी कुस्करा म्हणतं तर कुठे चुरमा. यासोबत ताजे विरजलेलं दही अथवा नुकत्याच काढलेल्या लोण्याचं ताक असेल तर सोनेपे सुहागा.
तीच कथा फोडणीच्या भाताची. शिळा भात मात्र फडफडीत असावा लागतो,बाकी सर्व प्रोसिजर फोडणीच्या पोळीसारखीच, फरक एवढाच की यासोबत दही अथवा ताक न खाता लिंबू पिळून छान लागते. हा भात कोणत्याही व्हेज फ्राईड राईस किंवा व्हेज पुलाव यांच्या थोबाडीत मारेल एवढा टेस्टी लागतो. शिळी कुस्करलेली पोळी आणि शिळा भात याला एकत्र करून फोडणी दिली तर याला "मनोहर" म्हणतात असे अंधूकसे आठवते.
आज्जी आणि आईच्या हातचे हे पदार्थ खाणं म्हणजे एक पर्वणी आहे,का सांगू? कारण त्यामध्ये इतर सर्व गोष्टींसोबत थोडं प्रेमही मिसळलेलं असतं! सुजाताही प्रयत्न करते तशीच बनवण्याचा आणि "आईसारखीच झालीय" अशी पावती मिळाली की तिचाही चेहरा उजळतो!

याठिकाणी आजीच्या आठवणीमुळे अजून एक पदार्थाचे वर्णन केल्याशिवाय रहावत नाहीये,तो म्हणजे तीन पिठी थालीपीठ. कणिक,ज्वारीचं पीठ आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. यात रात्री उरलेली भाजी,किंवा फोडणीचं वरण टाकायचं(वांग्याची भाजी असेल तर मग लॉटरी लागली समजा) या कालवलेल्या पिठाचं तेलावर फ्राय केलेलं थालीपीठ काय अप्रतिम लागतं म्हणून सांगू! मात्र यावर ताज्या लोण्याचा गोळा हा हवाच.

अजून एक प्रश्न मला नेहेमी सतावतो,तो म्हणजे हे पदार्थ फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये का मिळत नाहीत? हो, म्हणजे जर का तिथे तारेच्या कळकट स्टँड मध्ये मळकट ग्लासमध्ये "कटिंग"चाय पन्नास रुपये ग्लास(अर्धा) मिळू शकतो तर मग या चविष्ट डिशेस का नाही! मला खात्री आहे की जर का हे लिखाण कुणा दर्दी शेफच्या नजरेस पडले तर तोही दिवस दूर नाही! पुढच्या वेळी जाल कुठे कॉन्फरन्सला आणि ब्रेकफास्ट करायला तिथल्या रेस्टॉरंट मध्ये तर दिसेल तुम्हाला "chopped fried Indian roti garnished with onion & corriander", किंवा "Traditional Indian fried rice", किंवा Grandma special Indian pancake!" मात्र या टेबलवर लाईन खूप लांब असेल हेही तितकेच खरे!

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ