Skip to main content

नागपूर,आमचे लाडके नागपूर!

नागपूर,आमचे लाडके नागपूर!

आमच्या आयुष्याची सर्वात तरुणाईची, उमेदीची वर्षे ज्या शहरात गेली ते नागपूर! त्याविषयी खूप खूप गोष्टी आहेत,लिहीत बसलो तर एक जाडजूड पुस्तकच तयार होईल,पण आज एका खास आठवणीला उजाळा देण्यासाठी हा प्रपंच,ती म्हणजे नागपूरचे इंडियन कॉफी हाऊस!

नागपूरमध्ये त्यावेळी चार ब्रांचेस होत्या या ओरिजनल मद्रासच्या कॉफी बोर्ड ऑफ इंडियानी चालविलेल्या कॉफी हाऊसच्या : एक धंतोलीतील पंचशील चौकाच्या अलीकडील यशवन्त स्टेडियमसमोर,एक धरमपेठेत लक्ष्मीभुवन, सरोज टॉकीजसमोरील वेस्ट हायकोर्ट रोडवर,मुख्य शाखा
 सदरमध्ये लिबर्टी टॉकीज शेजारी,आणि चवथी म्हणजे आमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजातील,आमच्या रोजच्या जीवनाचं अविभाज्य अंग असलेलं!

या कॉफी हाऊसला एक ऑरा आणि अरोमा अशा दोन्ही गोष्टी होत्या.आत शिरल्याबरोबर एक टिपिकल फिल्टर कॉफीचा घमघमाट(अरोमा) आणि एका वेगळ्याच साऊथ इंडियन संस्कृतीचं वातावरण(ऑरा)
पॉलिश केलेलं लाकडी फर्निचर,पांढरे स्वच्छ कडक इस्त्रीचे कपडे आणि त्यावर तुर्रेबाज फेटा घातलेले मितभाषी वेटर्स,आणि काउंटरवर बसलेला सो कॉल्ड मालक मात्र साध्या वेशात! मेनुकार्ड मागायची कधी जरूरच भासली नाही कारण आमचा मेनू फिक्स असायचा: घाई असली तर वडा उपमा किंवा इडली सांबार,वेळ असला तर दोसा- उत्तपा किंवा कटलेट! इथले कटलेट खूप छान असायचे आणि एक वेगळीच गोडसर चव असायची,बहुधा बिटरूट चा वापर करीत असावेत.त्यावर जे सॉस मिळायचे ते सुद्धा काचेच्या बाटल्यात नसून लाल रंगाच्या पांढरे झाकण असलेल्या पिचकारीसारख्या प्लास्टिकच्या बाटलीत असायचे,चवही टोमॅटो सॉसपेक्षा वेगळीच असायची, पण आवडायची मात्र नक्की!

इथली सर्वात घाईची वेळ म्हणजे सकाळी सात ते आठ! सर्व हाऊस ऑफिसर्स वार्ड किंवा ओटीच्या आधी घाईघाईनं नाश्ता करून पुढे जायचे,कुणाला बोलायला वेळ नसायचा.आठ ते दहा म्हणजे सकाळच्या लेक्चर्सला चाट मारलेली अंडर ग्रॅज्युअटची पोरं, आणि दहा ते साडेअकरा म्हणजे राउंड झाल्यावर बॉस सोबत आलेलं पूर्ण युनिट! तो सीन पाहण्यालायक असायचा : आयताकृती टेबलाच्या छोट्या बाजूकडील एकमेव असलेल्या खुर्चीवर बॉस,त्याच्या दोन्हीकडे असलेल्या दोन बाजूस त्यांचे डावे/उजवे हात-रीडर/लेक्चरर,त्यानंतर रजिस्ट्रार,पीजी स्टुडंट्स आणि या सर्वांची नीट व्यवस्था होतेय की नाही हे बघणारा हाऊस ऑफिसर! मात्र यावेळचे सर्व बिल बॉस देणार हा मात्र अलिखित शिरस्ता होता! एनके सर,दास सर,चौबे सर,सूर सर ही दिगग्ज मंडळी आली की काय थाट असायचा म्हणून सांगू! आणि रेडियोलॉजीचे व्हील चेयरवर आलेले,पांढरी फर कॅप घातलेले रुबाबदार दिवेकर सर दिसले की आपोआपच हात जुळायचे आणि मस्तक लिन व्हायचे!
बारा ते चार हा पिरेड पुन्हा पिरेड चुकव्यांसाठी किंवा प्रेमी युगुलांसाठीचा! कुणाचा कुणाशी टाका भिडलाय हे इथे कळायचे.

या कॉफी हाऊसला उधाण यायचे ते गॅदरिंग आणि इलेक्शनच्या काळात! कॉस्मो पॅनल,फ्रेंड्स पॅनल,उभे असलेले उमेदवार,घोषणाबाजी जिंकल्यावरचा जल्लोष,या सर्वांचा साक्षीदार आहे हे कॉफी हाऊस!

खूप वर्षात गेलो नाही नागपूरला आणि मेडिकलच्या कॉफी हाऊसमध्ये,पण पुढच्या भेटीत मात्र नक्की जाणार आणि नागपूरमध्ये असलेल्या सर्व
मित्रांना भेटायला तिथेच बोलावणार हे ठरलं!!💐💐

(कॉफी हाऊस आणि दोसा,याबद्दलचे अनुभव कथन पुढच्या भागात!🙏)

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ