Skip to main content

"क्रिकेट मॅनिया"

"क्रिकेट मॅनिया"

सध्या आयपीएल ने भारावलेलं वातावरण आहे.रोज संध्याकाळी कधी एक तर कधी दोन मॅचेस चालू आहेत,कोणतीही टीम असो,ग्राउंड प्रेक्षकांनी फुल्ल! त्यांच्या लाडक्या टीमचा युनिफॉर्म घातलेले,रंगीबेरंगी टोप, रंगवलेली तोंडं, हातात फलक, चौका किंवा छक्का मारला,की तोकडे कपडे घालून नाच करणाऱ्या चियर-गर्ल्स,एयर कंडिशंड बॉक्सेस मध्ये बसलेले टीमचे मालक(शाहरुख-अंबानी-प्रिटी झिंटा....विजय माल्याची कमी जाणवतेय मात्र!) करोडो रुपये खर्च करून विकत घेतलेले निरनिराळ्या देशांचे हे प्लेयर्स,हजारो रुपये खर्च करून पहायला आलेले प्रेक्षक आणि थेट प्रक्षेपण करून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या वाहिन्या.........वेळ आणि पैसा याचा जमाखर्च माझ्या बुद्धीच्या कुवतीबाहेरचा आहे!😇😇

 या अनुषंगानं मागे आपण टी-ट्वेन्टी विषवचषक जिंकला त्यावेळची आठवण आली.सारे भारतवर्ष आनंदाने न्हाऊन निघाले होते,भारतीय असण्याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला वाटू लागला होता.विजयी चमूचे धडाकेबाज स्वागत आपण केले आणि सहार विमानतळ ते वानखेडे स्टेडियम अशी पस्तीस किलोमीटरची भव्य मिरवणूक आपण काढली.स्टेडियमवर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षिसांच्या खैरातीचा कार्यक्रम झाला,या सर्वांचा एक छोटासा आर्थिक आढावा घेऊया.......

भारतीय विजयी चमूला आयसीसी कडून अधिकृत बक्षीस मिळालेली रक्कम ४ लाख ९० हजार डॉलर्स-सुमारे २२ कोटी रुपये,(ज्याचे आपण अधिकृत हक्कदार आहोत!) स्वागत,मिरवणूक,शोभायात्रा,वानखेडे स्टेडियमवरचा कार्यक्रम,आतिषबाजी,खेळाडू आणि मान्यवर यांची सुरक्षा व्यवस्था इत्यादींचा ढोबळ खर्च-५ कोटी रुपये.श्री.शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टीमला २० लाख डॉलर्सचे(सुमारे ९ कोटी रुपये)- प्रत्येक खेळाडूला ८० लाख प्रमाणे १५ खेळाडूंना १२ कोटी रुपये,प्रत्येक राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील खेळाडूंना सरासरी ३ लाख प्रमाणे सर्वांना मिळून ४५ लाख रुपये,सहारा इंडिया कडून प्रत्येकास कमीतकमी २५ लाखाचे एक अशी १५ घरे म्हणजे पावणेचार कोटी रुपये.नागरी उड्डयन मंत्री यांनी प्रत्येक खेळाडूला पुढील  पाच वर्षांसाठी अमर्यादित अंतर्देशीय विमान प्रवास फुकट जाहीर केला होता.प्रत्येक खेळाडू मॅच किंवा शिबिरासाठी बोर्डाच्या पैशांची विमानानी जातोच,आता फुकट म्हंटल्यावर कमीतकमी तीन चकरा तो महिन्यातून करेलच.एक फेरी जाऊनयेऊन कमीतकमी १५ हजारात जाते (इकॉनॉमी क्लासची) म्हणचे दरमहा दर खेळाडू ४५ हजार,एक वर्षात ५ लाख ४० हजार,पाच वर्षात सत्तावीस लाख आणि सर्व खेळाडू मिळून पाच वर्षात साधारणतः साडेचार कोटी रुपये.म्हणचे खेळाडूंना अधिकृत २२ कोटी बक्षिसाशिवाय इतर २२५ कोटी रुपयांची उधळण  झाली आहे. आणि हे पैसे मंत्री-खासदार-आमदार यांच्या खिशातले नसून सरकारी तिजोरीतील (पापभिरू,सज्जनतेनी कर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा) आहे.खेळाडूंच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन तर करायलाच हवे,पण जनतेचा पैसा बक्षीस म्हणून खैरात करण्याचा आणि उधळपट्टी करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे  झाली होती त्यावेळी NCEUS या संस्थेने त्यामागील दहा वर्षातील सरकारी आकड्यांच्या आधारावर एक अहवाल प्रसिद्ध केला होता.त्यानुसार देशातील ७० टक्के जनता  दिवसाला २० रुपये कमवत होती,दारिद्र्य रेषेची मर्यादा दिवसाला १२ रुपये असल्यामुळे हे नागरिक दारिद्र्य रेषेखालील गणल्या जात नव्हते.वास्तविक हे नागरिक मोठ्या मुश्किलीनं स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत,पण हे वास्तव "दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या संख्येत घट"या बातमीखाली लपवले गेले! शेतकऱ्याच्या आत्महत्येचे आपणास काहीच वाटत नाही कारण त्याचा सरळ संबंध आपणाशी नसतो.बाजारात अन्नधान्याचे वाढणारे भाव आपल्याला खटकतात,पण मरमर करून कोट्यावधी जनतेसाठी धान्य उगवणाऱ्या शेतकऱ्याच्या तुटपुंज्या मोबदल्याचा विचार आपण करत नाही.त्यामध्ये,यावर्षी अमुक अमुक कोटी रुपयांची तरतूद शेतकरी वर्गासाठी करण्यात आली आहे ही नेत्यांची घोषणा दिलासा देते पण ही मदत खरंच किती गरजवंतांपर्यंत पोहोचते?

सारे भारतवर्ष जल्लोष करीत असतांना आणि खेळाडूंवर बक्षिसांची खैरात करत असतांना मी रेल्वे फलाटावर उभा राहून रेल्वे रुळांवर प्रवाशांनी फेकलेल्या अन्नावर पोटाची खळगी भरणारी ८-१० मुलं  डोळ्यात पाणी आणून पहात होतो.हे अश्रू वाया न जाऊ देण्यासाठी काय करावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करीत आहे,आहे का उत्तर तुमच्याजवळ?😥😥

वैधानिक इशारा :
१.खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे,मी स्वतः खेळाडू आहे,त्यामुळे,कोणत्याही खेळाडूचा अनादर करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही.🙏

२..माझं गणित कच्चे आहे(त्यामुळेच मी भीतीनं बारावीला गणित सोडून बायोलॉजी घेतलं आणि डॉक्टर झालो) त्यामुळं आकडेमोडीतील चुकभुल घेणे-देणे आणि माफ करणे!🙏

३. या पोस्टद्वारे कोणत्याही आजी-माजी राजकीय नेते अथवा पक्ष यांच्यावर टीका किंवा आरोप करण्याचा उद्देश नाही,स्वतंत्र देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून मला जे वाटले ते लिहिले,गैरसमज नसावा!🙏

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ