Skip to main content

"चिंटू"

"चिंटू"

गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल,नागपूर,जुलै १९८५ ची घटना आहे,माझा सर्जरीचा हाऊसजॉब संपून दुसरा जॉब ऑर्थोपेडिक्स मध्ये सुरू झाला होता.तो रविवार होता आणि चोवीस तासाची इमर्जन्सी ड्युटी लागली होती. ती कॅज्युअलटी मध्ये सीएमओ सोबतच बसून करायचो,कारण मारामाऱ्या, अपघात यामधील हाडांशी निगडित जखमा आम्हालाच बघून उपचार करावे लागायचे,त्यामुळे तिथेच सुरवातीला बघून इमर्जन्सी ट्रिटमेंट देऊन मग वॉर्ड किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये हलवणे सोयीस्कर असायचे. आठ वाजता सुरू झालेल्या ड्युटीत साडेदहा वाजेपर्यंत दोनचार किरकोळ अपघाताच्या केसेस (ज्यात फक्त प्लास्टर घालून काम भागले) सोडल्या तर बाकी बऱ्यापैकी आराम होता आणि आम्ही तिघे रेसिडेंटस सीएमओ बरोबर समोरच्या कँटीन मधून चहा मागवून पीत बसलो होतो,पण हे माहीत नव्हतं की ती वादळापूर्वीची शांतता होती!

अकरा वाजले आणि सुसाट आलेली एक पोलीस जीप कॅज्युअलटी च्या दारात येऊन थांबली.चार हवालदारांनी पटकन आवाज देऊन स्ट्रेचर मागवला आणि एका दहाबारा वर्षाच्या मुलाला जीपमधून उचलून स्ट्रेचरवर टाकून आत आणले.आम्ही ताबडतोब त्याला टेबलवर घेतले,त्या मुलाचे दोन्ही पाय ट्रक च्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले होते.मुलगा बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुद्धच  होता.(Hypovolemic & neurogenic shock due to excessive bleeding & pain)
आम्ही आमच्या ठरलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे कामाला लागलो : ऑक्सिजन लावला,एकाने अठरा नंबरच्या सुईने भराभर सलाईन देणे सुरू केले,दुसऱ्याने रक्तगट तपासायला ब्लड सॅम्पल काढले,तिसऱ्याने दोन्ही मांड्यांना रबरी नळीने घट्ट आवळले(Tourniquet) जेणेकरून रक्तस्त्राव थांबावा.सर्जरीच्या दोन रेसिडेंटसनाही बोलावून घेतले त्यांनी इतर अंगावर कुठे मार आहे का म्हणजे डोकं, पोट, छाती वगैरे तपासले आणि आम्हाला पेशन्ट स्टेबिलाईज करायला मदत करू लागले.त्यांनी दुसऱ्या हातावर एक मोठी नस उघडून (venesection) त्यात सोळा बोअरचा कॅन्युला टाकून फास्ट रक्त द्यायची सोय करून ठेवली.
एवढे झाल्यावर मी तातडीनं ब्लड बँकेत पळालो,माझा रक्तगट ओ आर एच निगेटिव्ह आहे,इमर्जन्सीत कुणालाही चालणारा, पहिली बाटली माझीच काढ म्हंटलं आणि तशीच दे,क्रॉस मॅच करायला वेळ नाही! आणि हे त्याचं सॅम्पल,तीन बाटल्या क्रॉस मॅच करून ठेव,मी पाठवतो अटेंडन्टला फॉर्म्स घेऊन.(मेडिकलच्या ब्लड बँकेत वट होती आमची कारण आम्ही सर्व रेसिडेंटस आणि स्टुडंन्ट्स नेहेमी ब्लड डोनेट करायचो तिथे.माझा क्लासमेंट आणि आता अकोल्याला स्थायिक झालेला सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट,डॉ.शशिकांत मोरे यांच्या पुढाकाराने आणि प्रोफेसर तुंगार सर यांच्या मार्गदर्शनाने Voluntary blood donors organisation,VBDO,च्या माध्यमातून कॅम्पस करून भरपूर बाटल्या जमा करायचो गरजू रुग्णांसाठी.)पहिली बाटली फास्ट दिली,अर्ध्या तासाने दुसरी पण आली आणि एक तासात तिसरी! तीन बाटल्या रक्त आणि तीन सलाईन दिल्यावर त्याचं ब्लड प्रेशर जरा बरं वरती आलं आणि पोर शुद्धीत येऊ लागलं!

आता दुसरी स्टेज सुरू :
नाव-पत्ता विचारायचा,म्हणजे जवळच्या नातेवाईकांचा शोध घ्यायचा.पोलीस होतेच थांबलेले.

नाव : चिंटू      वय : अकरा वर्षे.

पत्ता :इंडियन जिमखान्यामागील "तकीया"झोपडपट्टी,अजनी रेल्वे स्टेशन रोड.

नातेवाईक : फक्त आई,वडील वारलेले,भाऊ-बहीण नाहीत.

आईच नाव?.... वत्सलाबाई.

आई काय करते : लोकांकडे धुणं-भांडी-झाडू-पोछा.

शाळेत जातोस का? हो,सहावीत आहे.

कसा पडला?

आई कामावर गेली होती,मला दळण आणायला सांगितलं होतं,मी शाळेच्या आधी दळण आणू म्हणून सायकलच्या कॅरियरला डबा अडकवला आणि निघालो, रस्त्यात मागून जोरात आलेल्या ट्रकचा धक्का लागला,मी पडलो,पुढचे काही आठवत नाही. माझा दळणाचा डब्बा सांडला आणि खिशातले आठ आणे हरवले आता आई रागवेल......त्याच्या डोळ्यात पाणी होत!

पोलिसांनी सांगितलं की ट्रक ने धडक दिल्यामुळे हा पडला आणि त्याच्या चाकाखाली आल्याने याचे दोन्ही पाय गुडघ्याच्या वर चिरडल्या गेले.
पोलीस त्याच्या आईला शोधून आणायला रवाना झाले.
आम्ही त्याला वेदनाशामक इंजेक्शन दिले होते त्यामुळे तो झोपला.आम्ही त्याची आई येईपर्यंत दुसऱ्या केसेसमध्ये गुंतलो.

चिंटूच्या दोन्ही पायाचा गुडघ्यावर  अक्षरशः चुरा झाला होता आणि जीव वाचवण्यास त्याचे दोन्ही पाय कापावे लागणार होते.( bilateral above  knee amputation)

तीन तास लागले पोलिसांना त्याच्या आईला शोधून आणायला,तोपर्यंत आमची ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती,मेडिकल कॉलेजमध्ये ती असतेच नेहेमी म्हणा! प्रश्न होता तो म्हणजे आईला समजावून ऑपरेशनसाठी तिची संमती घ्यायचा,कारण फार मोठा निर्णय होता तो! आई धीराची होती,अकाली नवरा वारल्यावर स्वतःच्या हिमतीवर ती कष्ट करून पोराला शिकवत होती,ती एवढंच म्हणाली,पाय गेलेत तर जाऊद्या,माझा चिंटू तर वाचेल ना? हो आई,आम्ही आहोत ना,करतोय सर्व प्रयत्न,आणि देवावर विश्वास ठेवा,तो आहेना आपल्या पाठीमागे.
देव नाही रे बाबा या जगात,आणि असलाच,तर तो आंधळा,बहिरा,मुका,लुळा-पांगळा आणि श्रीमंतांचा आहे,आमच्या गरिबांचा नाही,तुम्हीच देव आहात  माझ्यासाठी,करा तुमचं काम,मी थांबते इथं!

झालं ऑपरेशन,कापले दोन्ही पाय गुडघ्याच्या वर,जांघेच्या खालपर्यंत.आमचे युनिट हेड डॉ.गेडाम सरांनी त्यांच्या अधिकारात त्याकाळची सर्वात चांगली महागडी प्रतिजैविके (higher antibiotics & steroids)बाहेरून विकत आणवली,चिंटूला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं निगराणीसाठी,आणि आईंची सोय केली त्यासमोरच्या व्हरांड्यात.शेजारी-पाजारी होते,पण आईची जेवण्याखाण्याची सोय आम्ही तिघे रेसिडेंटसनी करण्याचे ठरवले.पहिले ४८ तास बरा होता चिंटू,शुद्धीवर होता,मात्र पाय कापल्याचे त्याला सांगितले नव्हते,झाकून ठेवले होते चादरीखाली,आणि एक गम्मत सांगतो,पाय कापल्यावरही त्या मज्जातंतूंचा गोंधळ उडतो आणि ते मेंदूकडे पाय दुखणे,खाज सुटणे असे चुकीचा संदेश पोचवितात,त्यामुळे पाय आहेत असेच रुग्णाला वाटते (Phantom limb.) तिसऱ्या दिवशी चिंटूची प्रकृती खालावण्यास सुरवात झाली आणि जंतूंच्या प्रादुर्भावामुळे होणारा Septicaemia & multiorgan failure ची लक्षणे दिसू लागली. रस्त्यावरील अपघात,जखमेतील धूळ-माती,रक्तस्त्राव,अपघात झाल्यापासून ते दवाखान्यात पोहोचेपर्यंत लागलेला वेळ,अगोदरच कमी असलेली प्रतिकारशक्ती,चिरडलेल्या स्नायूंपासून निघणारी विषे(Toxins),अशी कित्येक कारणे आहेत यासाठी, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आम्ही चिंटूला वाचविण्यास अपयशी ठरलो आणि केवळ चार दिवसातच आम्हाला जीव लावलेला तो एवढासा जीव अनंतात विलीन झाला!😔
त्या माऊलीच्या गळ्यात पडून आम्ही हमसाहमशी रडलो,आणि तिला म्हणालो,आई,आता आम्हीच आहोत तुझी मुलं, तुझे चिंटू! मित्रांनो,पुढची अडीच वर्षे आम्ही तिघे दर महिन्याला पगार झाला,की शंभर-शंभर रुपये जमा करून तीनशे रुपये त्या वत्सलाबाई नावाच्या आमच्या आईला पोचवायचो,(त्या स्वाभिमानी मातेला पटवायला  बराच वेळ लागला खरा!) थोडावेळ बसायचो,गप्पा करायचो,तीही मायेनं आमच्या डोक्यावरून हात फिरवायची,आणि एकेक बेसनाचा लाडू द्यायची. मित्रांनो,आजपर्यंत इतका स्वादिष्ट बेसनाचा लाडू मी खाल्ला नाही,कारण त्यात एका अवीट गोडीचं खूपसारं प्रेम टाकलं असायचं!

नागपूर सुटल्यावर या भेटी कमी झाल्या आणि कालांतराने थांबल्या.आता नागपूरही खूप बदललंय, तकीया झोपडपट्टी जाऊन कदाचित एखादी मॉडर्न टाऊनशीप झाली असेल तिथे,पण पुढच्या नागपूर भेटीत मी दोन दिवस ठेवलेत वत्सलाबाईंचा शोध घ्यायला,बघूया,नियती काय रंग दाखवते ते!

तर मित्रांनो,या डॉक्टरीच्या पवित्र व्यवसायानी मला जात-पात-धर्म-श्रीमंती-गरीबी, या सर्वांच्या पलीकडे जाऊन खूप जवळची नवीन नाती दिली आहेत :
रक्ताचे आई-वडील जरी एकच असले,तरी तितकीच माया लावणारे अनेक आई-वडील मला आहेत, सक्खा भाऊ जरी एकच असला तरी त्याइतकेच प्रेम करणारे अनेक भाऊ आहेत,जीव लावणाऱ्या अनेक बहिणी आहेत,बायको जरी एकच असली तरी.............सॉरी,सॉरी.😜

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ